दि. २१/०७/२४
लोकपर्व न्यूज नेटवर्क:- आषाढी वारी साठी आलेल्या सर्व संतांच्या पालख्या गुरू पौर्णिमेच्या दिवशी गोपाळपूर ता. पंढरपूर येथील श्रीकृष्ण मंदिरात एकत्रित आल्या मोठ्या उत्साहात अभूतपूर्व अशा पध्दतीने गोपाळकाला साजरा करण्यात आला. रविवारी गुरू पौर्णिमा व गोपाळकाला असल्याने पहाटे साडे चार वाजल्यापासून पंढरपूरात व शहराच्या आजूबाजूला, ६५ एकर क्षेत्रावर थांबलेल्या पालख्या दिंड्या आपल्या दैनंदिन धार्मिक कार्यक्रम व पुजा अर्चा उरकून गोपाळपूर कडे आगेकूच करत होत्या.
आपल्या मठातून गोपाळपूरकडे जाताना दिंडीतील वारकरी.
संतांच्या पालख्या सहीत वारकरी
त्यांचा ओघ दुपारी एक वाजेपर्यंत चालू होता. गोपाळपूरात आल्यावर एक मेकाची गळाभेट, चरण स्पर्श , तर इतर भाविक पालखी , संत दर्शन घेत होते.
आषाढी वारी व गोपाळकाला निमित्ताने श्रीकृष्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती . एकूणच चैतन्यमय वातावरण होते. कारण संपूर्ण आषाढी यात्रा कालावधीत अनुचित प्रकाराला फारसा वाव मिळाला नाही. आणि विशेष म्हणजे पावसाने यात्रा कालावधीत विश्रांती घेवून प्रशासनाला नैसर्गिक सहकार्य केले व गोपाळ काल्यालाही कोणतीच बाधा पोहचली नाही.
त्यामुळे गोपाळकाला गोड झाला...तो गोपाळाने गोड केला.. आषाढी वारी ही गोड झाली..!
एक प्रकारे वारीचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे गोपाळपूर कडे येणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील गोणूर तालुक्यातील श्री संत महम्मद खान महाराज नामक या पालखीने जणू सर्व धर्म समभाव शिकवणच दिली या पूर्वीच दोन वर्षांपासून वारकरी सांप्रदायात सक्रीय असलेल्या महम्मद शेख महाराजांचीही दिंडी सूरु झाली आहे. म्हणजेच गोपाळकाल्याने सर्वधर्माचा काला करून गोडवा वाढवला. गोपाळ प्रत आल्यानंतर सर्व संतांच्या पालख्यांचे स्वागत सरपंच उज्वला बनसोडे, विश्वस्त दिलीप गुरव ग्रामविकास अधिकारी ज्योती पाटील व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले.
गोपाळकाला झाल्यावर सर्व संतांच्या पालख्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे रवाना झाल्या . थोड्या वेळ थांबून संतांच्या पालख्यानी देव दर्शन घेतले . देव व संत भेट हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी लाखो भक्तगण जमले होते. देव अर्थात विठ्ठल रुक्मिणी दर्शन झाल्यानंतर सर्व संतांच्या पालख्या परतीच्या मार्गावर लागल्या.
* पोलिस प्रशासनाचा संपूर्ण यात्रा कालावधीत चोख बंदोबस्त
काल गोपाळकाल्या निमित्ताने गोपाळपूरला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची वाहतूक सात तास थांबवण्यात आली होती.
त्याचबरोबर संपूर्ण आषाढी यात्रा कालावधीत ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाने आपली भूमिका वक्तशीर पणे निभावल्याने संपूर्ण आषाढी वारीच उत्साहात पार पडली.
वाहतूक थांबवण्यासाठी ठिकठिकाणी करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त.
गोपाळकाल्यासाठी लाह्या व दही विकताना व्यवसायिक.
0 Comments